सोमवार, १८ जुलै, २०११

पिंपरी तलाव - ताम्हिणी घाट


देवाने पृथ्वीवर काही ठिकाणी स्वर्ग निर्माण करून ठेवला आहे त्यापैकीच एक ताम्हिणी .
ताम्हिणी घाटात कितीही वेळा गेले तर मनच भरत नाही.
ताम्हिणी घाटात  कुठल्याही ऋतूमध्ये जा त्याची सुंदरता जराही कमी होत नाही.
पण हो पावसाळ्यात ताम्हीणीचे सौंदर्य जरा नाही फारच जास्त खुलते.
ताम्हिणी घाट परिसरात अजून एक सुंदर ठिकाण आहे - पिंपरी व्ह्याली आणि पिंपरी तलाव .



जरा कमी गर्दीचे आणि सुंदर असे ठिकाण. लहान मोठे  धबधबे, भरपूर झाडी , धुक्यात हरवलेले डोंगर अन रस्ते . आणि गडबड गोंधळ नसलेला शांत परिसर. अतिशय सुंदर .



स्वर्गाचे प्रवेशद्वार

ताम्हिणी गाव ओलांडले की ३-४ किमी वर उजव्या हाताला लोणावळा फाटा लागतो.
फाट्यावरून उजवीकडे वळला की धुक्यात हरवत चाललेला एक लहानसा डांबरी रस्ता तुमची स्वागत करतो. नंतर हाच रस्ता धुक्याबरोबर झाडीतही वळणे घेत हरवत जातो. हा रस्ता किती सुंदर आहे म्हणून सांगू , स्वर्गाचे प्रवेशद्वार म्हटल्यावर त्याने सुंदर असायलाच हवे, नाही का ?







रस्त्यावर मधेच दिसतो एखादा गुराखी धुक्यातून वाट काढत चाललेला. तो आमच्या सारख्या हौशी छायाचित्रकारांसाठी अल्बममधे जपता येईल असा एक सुंदर फोटो देऊन जातो.











फाट्यापासून  फक्त २ किमी आहे पिंपरी. पिंपरीच्या अगोदरच रस्त्यात डाव्या हाताला लागेल एक सुंदर दरी. ह्या दरीतून कोकणातून घाटावर येणारे ढग वर येतात. अतिशय सुंदर नजरा असतो - जिकडे लक्ष जाईल तिकडे हिरवाईने नटलेले डोंगर, डोंगराभोवती घुटमळणारे ढग आणि डोंगरांच्या अंगा-खांद्यावरून कोसळणारे धबधबे.








कितीही फोटो काढा मन भरणारच नाही ...
मधेच येणारा जोरदार पाउस अगदी चिंब करून जातो - शरीर आणि मनही. गेली ५-६ वर्षे इकडे येतोय. येताना ठरवतो की जास्त वेळ इथे थांबायचे नाही पण इथे आले की पायच निघत नाही. दहा- बारा सुंदर फोटो घेऊ आणि परत निघू असे काहीतरी ठरवलेले असते पण त्या दहा-बारा फोटोंचे शंभर फोटो कधी होतात ते पण कळत नाही.

  





इथून निघून जरा पुढे गेला की लागतो एक सुंदर तलाव. लहान आहे तलाव त्यामुळे लगेच भरतो आणि त्याच्या भिंतीवरून पाणी खाली वाहायला लागते. फार सुंदर नजरा असतो. इथे भुट्टा,भेळ,भजी असलं  काहीही मिळत नाही. एकदम स्वच्छ आणि सुंदर परिसर.




   हे झाड तर कुठलाही ऋतू असुद्या कधीच बहरत नाही, मला तरी कधी तसे दिसले नाही.
पावसाळ्यात पण हा सजत नाही की काय ? कदाचित बिचाऱ्याचे सजणेच आपल्याला समजत नसावे...
  








 काही छायाचित्रे:
 खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकत इथे मी तासन-तास बसून राहू शकतो.
 

हाच तो तलाव आहे की नाही सुंदर !!!  
भिरा


उपयुक्त माहिती:

रस्ते:
*  पुणे-पौड-मुळशी-ताम्हिणी-पिंपरी 
*  ह्याच रस्त्याने पुढे लोणावळ्याला जाता येते (पिंपरी - भांबर्डे - कोराईगड -लोणावळा )


आसपासचा परिसर:
* ताम्हिणी(६ किमी), कैलासगड, घनगड, तैलबैला   


---BinaryBandya™  



मंगळवार, १२ जुलै, २०११

कळसुबाई

ह्या पावसाळ्यातला पहिला ट्रेक कुठला करायचा असा प्रश्न पडायच्या आतच उत्तर तयार होते - कळसुबाई पुण्याहून अंदाजे २०० किमी. आणि भंडारदरा धरणापासून ६किमी. भंडारदरावरून बारी (कळसुबाईच्या पायथ्याचे गाव) फक्त ६ किलोमीटर आहे.
धुक्यात हरवलेले कळसुबाईचे शिखर 
रंधा धबधबा


रस्त्यात भंडारदरा रस्त्यावरच उजव्या हाताला  रंधा धबधबा आहे. अतिशय सुंदर असा हा धबधबा एकदा तरी बघावाच. धबधबा ज्या घळीत उतरतो ती घळई (प्रवरा नदी )सुद्धा छान दिसते.  आख्खं बालपण गेलंय ह्या नदीच्या काठावर त्यामुळे जरा जास्तच प्रेम आहे ह्या नदीबद्दल .











ही शिडी डायरेक्ट स्वर्गात जाते ..

शेंडी गावात(भंडारदरा) जरा नाश्ता केला  आणि तिथून थेट कळसुबाई गाठले .
 बारी गावात कळसुबाई मंदिराजवळ गाडी लावण्याची सोय आहे . तिथूनच होते ट्रेकला सुरुवात :)

तसा ट्रेक काही अवघड नाहीये कारण जिथे जिथे अवघड रस्ता आहे तिथे तिथे लोखंडी शिड्या आहेत. अगदी ५०-५० फुट उंच शिड्या देखील आहेत.

 






आम्ही चढाईला सुरुवात केली पण धुक्यात हरवलेले कळसुबाईचे शिखर काही दिसतच नव्हते. त्यामुळे किती चढावे लागणार ह्याचा काहीच अंदाज येत नव्हता. तास दीड तास चढून गेल्यावर कळसुबाईला असलेली ढगांची मिठी सुटली आणि शिखराचे दर्शन झाले. हो महाराष्ट्रातले सगळ्यात उंच शिखर.


कळसुबाई


 काय सांगू तिथे गेल्यावर काय काय मनात येते .

सुंदर अतिशय सुंदर ..
अतिशय जोरात वाहणारा वारा ,
वाऱ्याबरोबर पळणारे काळे-पांढरे ढग,
ढगांच्या मिठीत अडकलेले डोंगर,
डोंगराच्या अंगाखांद्यावर झुलणारी हिरवी झाडे
आणि ह्या अशा निसर्गाच्या प्रेमात पडलेले आम्ही सारेजण ...







शिखरावर लहानसे देवीचे मंदिर आहे भगव्या रंगात रंगवलेले.
मंदिरासमोर आहे एक लोखंडी गज त्याला अडकवल्यात बऱ्याचश्या लहानमोठ्या घंटा, रंगबेरंगी कापडाचे तुकडे आणि एक-दोन  त्रिशूळ.  त्यातली गूढता मनाला अशी काही खेचत होती की त्याकडे कितीही वेळ बघितले तरी मन भरतच नव्हते.













मध्येच येणारी पावसाची सर बापरे!!! अक्षरशः सुया टोचल्यासारखे पावसाचे थेंब लागत होते. पण जर असा ट्रेक असेल तर कसलाही पाउस मंजूर.


 काही छायाचित्रे ..
भंडारदरा धरणाची भिंत 






उपयुक्त माहिती:

रस्ते:
*  पुणे-संगमनेर -अकोले - भंडारदरा - बारी - कळसुबाई


आसपासचा परिसर:
* भंडारदरा (६ किमी), रतनगड - अमृतेश्वर मंदिर (अंदाजे २५ किमी), रंधा धबधबा (१० किमी)
* अलंग- मदन- कुलंग , सांधण


---BinaryBandya™


गुरुवार, १७ मार्च, २०११

घनगड


धुक्यात हरवलेला घनगड
मागच्या पावसाळ्यात घनगडला गेलो होतो. फार अगोदरपासून तिकडे जायचे मनात होते पण तिकडचा शेवटचा टप्पा जाम अवघड होता. त्या शेवटच्या टप्प्यामुळे राहिलेला घनगड ट्रेक पूर्ण झाला तो तिथल्या ग्रामस्थांनी आणि काही ट्रेकर्सनी लावलेल्या शिडीमुळे. आता तो टप्पा शिडीमुळे बराचसा सुरक्षित झाला आहे आणि तुमच्या-आमच्यासारखे साधे-सुधे ट्रेकर्स पण गडावर जाऊ शकतात .





आम्ही सहाजण पुण्यावरून गेलो होतो. विशाल, माधव, सुरेश, प्रशांत, सुदर्शन आणि हो मी पण. नेहमीचाच ग्रुप. ताम्हिणी म्हटले की सगळेच तयार.
आमची गँग
ताम्हिणी घाट, पिंपरी व्हॅली, प्लस व्हॅली हे आमचे तसे जीवलगच.

ताम्हिणी म्हणजे काय विचारूच नका.  खरेतर ताम्हिणीमध्ये देवाने स्वर्ग बांधायला घेतला होता आणि बांधलाही. फक्त देव राहायला आले नाहीत एवढाच काय तो स्वर्गात आणि ताम्हिणी मध्ये फरक.

  रिमझिम पाउस, धुक्याची दुलई आणि
बुरुजात लपलेला घनगडाचा दरवाजा 
ट्रेकिंग - जगातले सगळ्यात वाईट व्यसन आहे हे !!!  आणि नेमके हेच कॉम्बीनेशन ह्यावेळी जमून आले होते.

गप्पा मारत, जंगलात घुसलो अन जंगलाचा ओळखीचा वास नाकात घुसला. अहा अशा वातावरणात मी/आम्ही तासंतास चालू शकतो. कधी गडावर पोहोचलो ह्याचा पत्ता पण लागला नाही. वाटेत एक लहानसे मंदिर लागले.   कशाचे मंदिर होते बरे, विसरलो. पुढच्यावेळेपासून ह्या
नोंदी ठेवत जाईन.



गड तसा लहानसाच आहे , तासाभरात चढून होतो आणि वरती २० मिनिटात पाहूनही होतो. गडावर फक्त बुरुजांचे अवशेष आहेत बाकी काही नाही.



कोराई गड

पण इकडून तुमची नजर थेट कोकणातच पोहोचते. कोकणात उतरणारे कडे एकदम खासच.कितीही वेळ गडावर बसला तरी कंटाळा नक्कीच येणार नाही. त्या दऱ्या, डोंगर कितीही नजरेत भरून घ्या, मन काही भरणार नाही.  समोर सुधागड,
कोराईगड दिसतात आणि तैलबैला आपल्याच थाटात उभा असलेला दिसतो.




आणि हो गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ उजव्या बाजूला एक मोठीशी शिळा गडाला टेकून  उभी आहे .
किती मोठी आहे बघायची आहे , तर मग हा फोटो बघा .
इथे आतमध्ये काही देव आहेत शेंदूर फासलेले.
आणि छोटीशी गुहा.
मस्त आहे ना?
आणि एक फोटो स्पॉट अजिबात विसरू नये असा, घनगड आणि शेजारच्या डोंगराच्या खोबणीत एक दगडांची उतरंड मांडून ठेवली आहे, माणसांनी नाही काय निसर्गानेच.
एकावर एक कितीतरी स्फटिक रचून ठेवावेत जणू , बारावीच्या भूगोलात अशा दगडांना काय म्हणतात ते होतं पण आता कोणाला आठवणार!

आणि कोणी कृपा करून अजिबात विचारू नका प्रत्येकवेळी अशीच पोज का देतो म्हणून.  


आणि शिडी चढताना जरा जपून, शिडी संपल्यावर डावीकडे वळायचे आहे , तिथे वाट लागते , जरा जपूनच चढा.
हीच ती शिडी , अगोदर इथे फक्त एक दोरी होती ...
                                           
परत येताना ताम्हिणी घाटामध्ये पण छान धुकं होतं. परत येताना घेतलेले काही फोटो.



ताम्हिणी मधले रस्ते 
कुठे आहे घनगड ?
जवळच. पुण्यापासून ८०-९० किमी. ताम्हीनीला जायचे , तिथून लोणावळा रस्ता घ्यायचा आणि भांबर्डे गाव गाठायचे
ह्याच गावातून गडावर जाता येते .
किंवा लोणावळ्यावरून -अ‍ॅंम्बी व्हॅली - भांबर्डे गाव असेही येता येईल.





आम्ही जाऊ शकतो का ?
हो , साधा-सुधा ट्रेक आहे. तुम्हीही जाऊ शकाल. शेवटच्या टप्प्यामध्ये जरा सावधगिरी बाळगा. बस पोहोचलाच.
आणि मदत हवी असेल तर आम्हाला विचारा ना राव ...


---BinaryBandya™


मंगळवार, ८ मार्च, २०११

फूस...

सहज कपाट चाळता चाळता "राजा शिवछत्रपती" पुस्तक हाती लागले. लगेच वाचायला घेतले ..
दहावीच्या सुट्टीत आणि इंजिनीरिंगला असताना हे पुस्तक वाचले होते.  त्यावेळी जमेल तेवढी कल्पनाशक्ती वापरून  गड -किल्ले , रस्ते , गावे डोळ्यासमोर  उभे करत असे .

 
 
 
 
पण आता मात्र गोष्ट वेगळी होती . आता पक्का भटक्या झालोय, नाही म्हटले तरी तीस एक किल्ले अन बराचसा कोकण, पश्चिम महाराष्ट्र फिरून झालाय. बराचसा महाराष्ट्राचा भूगोल समजलाय आता. 
शिवनेरी , जीवधन , राजगड , तोरणा , रायरेश्वर , पन्हाळा , रायगड , सिंहगड - तानाजी कडा , पुरंदर असे एक एक गड पुस्तकातून बाहेर येत होते  अन मी ह्या गडावरून त्या गडावर,  महाराजांचा मावळा बनून महाराजांबरोबरच फिरून येत होतो  (भूगोलासकट).  
खऱ्या -खुऱ्या गडांवर , खऱ्या -खुऱ्या बुरुजांवर .. 
 
 
 
 
मीही राजांबरोबर शिवनेरी ते जीवधन घोड्यावरून एका दमात रपेट मारून येत होतो,
त्या "तानाजी कड्या"वरून तानाजीबरोबरच वर चढून येत होतो .




 
 
अजूनही भरपूर किल्ले बाकी आहेत, बाजीप्रभूंची पावनखिंड पण बाकी आहे, 
प्रतापरावांची नेसरी बाकी आहे.
पण हो मी जाणारच कारण ...

"सह्याद्रीला सवयच आहे शूरवीर वाघांना फूस लावायची..."(इति बाबासाहेब पुरंदरे-राजा शिवछत्रपती) 

आम्हालाही भटकायची सवय म्हणा किंवा फूस म्हणा - सह्याद्री आणि शिवाजी महाराजांनीच लावली ... 


---BinaryBandya™

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०११

शिवजयंतीला सिंहगड



शिवजयंतीला रायगडला जायचं आमचा बेत
फसला, पण चैनच पडेना म्हणून मग कमीतकमी सिंहगडावर तरी जायचेच असे ठरवून घराबाहेर
पडलो. पण आमचे बेत सगळेच फिस्कटत गेले. गडाच्या पायथ्याला पोहोचल्यावर कळाले "काम चालू रस्ता बंद". मग काय "पावले चालती पंढरीची वाट" .
चालत जावून तानाजींना मुजरा घालायचा, सूर्यास्त बघायचा आणि लगेच परत फिरायचे असे ठरले.


 आमच्या नेहमीच्या ग्रुप बरोबर आज एक नवीन मावळा आला होता , त्याच्या वजनामुळे त्याला ढकलत ढकलत गडावर न्यावा लागला. पण पोहोचलाच तो गडावर .


गडावर पोहोचेपर्यंत सूर्याने क्षितिजावरून कल्टी मारली होती. सूर्य मावळला होता पण अजून त्याच्याकडून  क्षितिजावर विस्कटलेले रंग आवरायचे राहिलेच होते. आम्ही जमेल तेवढे रंग आमच्या कॅमेऱ्यात भरून घेतले. हे रंग तुमच्यासाठी ....


गडावर येताना "जय शिवाजी -जय भवानी" च्या घोषणा , ढोल-ताशांचा आवाज येत होता. आम्ही आज उशीराच आलो लवकर यायला हवे होते . गडावरून परत जाणाऱ्याच्या प्रत्येकाच्या कपाळावर गुलाल,कुंकू छान दिसत  होते. बरेच जण कुर्ता -पायजमा, फेटे अशा पेहरावात होते. छानच वाटत होते.




नंतर तानाजींच्या पुतळ्याला कुर्निसात, त्याचबरोबर भगवा झेंडा आणि शिवाजी महारांजाच्या प्रतिमेला कुर्निसात घालून परतीची वाट धरली. 

" सिंहगडावर जावून कांदाभजी नाही खाल्ली तर पाप लागते " म्हणे, म्हणून ७-८ प्लेट भजी ५ जणांनी खाल्लीच.

एवढे सगळं करेपर्यंत भरपूर अंधार झालाच होता. गडावर शांतता - छानच . पण
उतरायला सुरुवात केली तेवढ्यातच चंद्र उगवलाच.

मित्रांमध्ये वाद चालले होते-  एक म्हणे  फक्त सूर्यच उगवतो आणि मावळतो, चंद्र उगवत-मावळत नसतो , खरे खोटे काय ते चंद्र-सूर्यालाच माहित. एवढं मात्र नक्की आम्ही कशावरही वाद घालू शकतो .


चंद्र अप्रतिमच दिसत होता . त्याचे काही फोटोग्राफ्स ..
काही ठिकाणी आमच्यातला फोटोग्राफर जागा होतो
आणि मग  मागे राहिलो की बाकीच्या लोकांच्या आम्ही
शिव्या खातो . चालायचेच.

     कोणाकडे battery नव्हतीच, नशीब पोर्णिमा नुकतीच
होऊन गेली होती, त्यामुळे चंद्र पूर्ण जोषात होता.
गडावर अगोदरच आम्ही वाद घातला होता -पोर्णिमा झाली की अमावस्या चंद्र उगवल्यामुळे ह्या वादावर पडदा (उजेड?) पडला.


चंद्राच्या कृपेमुळे अडखळत- धडपडत का होईना पण शेवटी दहा-साडेदहाला पायथ्याला पोहोचलो. मग गाड्या घेऊन डायरेक्ट पुणे ...
---BinaryBandya™

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०११

मल्हारगड

पुण्याजवळचे किल्ले म्हटले की नजरेसमोर येतात ते सिंहगड-राजगड-तोरणा, लोहगड-विसापूर, पुरंदर. पण सासवड जवळ एक सुंदर मल्हारगड नावाचा किल्ला लपलाय . हा किल्ला सोनोरीचा किल्ला म्हणून पण ओळखला जातो . बहुतेक जणांना त्याचे नाव सुद्धा माहित नाही .
पुण्यावरून फक्त ३० किलोमीटर , दिवेघाट ओलांडला की डावीकडे सोनोरी गावात वळायचे . ४-५ किलोमीटर जात नाही तोवरच उजव्या हाताला एक मोठा दरवाजा दिसतो . इथे ज्यांनी मल्हारगड बांधला त्या पानसे सरदारांच्या वाड्याचे अवशेष आहेत . गडाच्या पायथ्यापर्यंत तुमची चार-चाकी गाडीही आरामात जाऊ शकते. गडाच्या पायथ्यापासून माथ्यावर पोहोचण्यास फारतर ४५ मिनिटे लागतात . गडावर खंडोबा आणि महादेवाची प्रेक्षणीय अशी मंदिरे आहेत . गडाचा पसारा फार मोठा नाहीये, १५-२० मिनिटात सगळा गड पाहून सुद्धा होतो .

दिवेघाटावर टेहाळणी करण्यासाठी पेशव्यांच्या कारकिर्दीत हा गड बांधला गेला. गडाची तटबंदी अजूनही शाबूत आहे . आतमध्ये १-२ पडक्या अन कोरड्या विहरी आणि आतल्या लहान किल्ल्याचे काही अवशेष सोडले तर गडावर मोठे असे बांधकाम नाहीये. गडाचे बुरुज, तटबंदी पण राजगड-सिंहगड सारखे मोठ्या आकाराच्या नाहीयेत . गडावरून लोणी परिसर ,सासवड परिसर दूरवर पसरलेला दिसतो.
पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे गडावर फारसे लोक -पर्यटक येत नाहीत . खरेच मनापासू जे भटके लोक आहेत ते येतात . त्यामुळे गडाचा परिसर अगदी स्वच्छ आहे , प्लास्टिक च्या बाटल्या नाहीत , केर कचरा नाही . गडावर गेल्यावर मन अगदी प्रसन्न होते.
पाण्याची आणि जेवणाची सोय स्वतःच करावी. गडावर पाणीही नाहीये अन खायला काहीही मिळत नाही . आणि जर कोणाला गडावर राहायचे असेल तर महादेवाच्या मंदिरात ५-६ जण राहू शकतात.
तुम्हाला शांत आणि गर्दी नसलेल्या ठिकाणी जायचे आहे अन ते पण पुण्याजवळ तर मल्हारगड एक चांगला पर्याय आहे .









गडावरून सूर्योदय फार छान दिसतो . आम्ही पहाटे ५ लाच पुण्यातून निघालो होतो आणि ६.३० ला गडावर पोहोचलो देखील सूर्याच्या अगोदर . भरपूर वेळ वाट पाहायला लावली पट्ठ्याने म उगवला एकदाचा .
मस्त पोज दिली त्याने .











उपयुक्त माहिती:

रस्ते:
* पुणे-दिवेघाट-सोनोरी-मल्हारगड
* पुणे-दिवेघाट-झेंडेवाडी-मल्हारगड

आसपासचा परिसर:
* सासवड , दिवेघाट , पुरंदर-वज्रगड , नारायणपूर

-- अभिजित

बुधवार, २१ जुलै, २०१०

राजगड

२-३ वेळा राजगड ला जाऊनही बालेकिल्याला भेट द्यायचे राहिलेच होते. कधी सुवेळा माची कधी संजीवनी माची पण बालेकिल्ला मात्र प्रत्येकवेळी चकमाच देत होता . एकदा तर आमच्या पैकी फार शेवाळ होते म्हणून परत आलो होतो. ह्यावेळी मात्र फक्त बालेकिल्लाच सर करायचा एवढेच ठरवून राजगड चढायला सुरुवात केली होती .

नेहमीच ट्रेक ठरवण्यासाठी आम्ही सगळे mail mail खेळतो .15-20 mail नंतर माहित नसलेल्या , जाऊन आलेल्या सगळ्या गडांची नावांचा काथ्याकुट झाल्यावर कुठे राजगड बालेकिल्ला final झाला होता ...

नेहमीप्र

माणे सकाळी ६ चा प्लान होता पण पण ..आमच्या मावळ्यांची साखर झोप मीच मोडली. कुणी आंघोळ केलीच नाही फक्त तुळसच लावून आले . एक एक cutting चहा मारला आन पकडला रस्ता राजगडचा वडगाव जवळ अजून एक मावळा योगेश्वर आम्हाला जॉईन झाला. (त्याला आम्ही फील मास्तर म्हणतो, प्रत्येक गोष्टीत ह्याला फीलाच आला पाहिजे मग तो चहा असुदे , जेवण असुदे वा अगदी तुळस लावायची असेल तरीही फील महत्वाचा ... )

वातावरण एकदम पावसाळी अजिबात नव्हते , पावसाळा अन उन्हाळा ह्यांच्या मधेच असल्यासारखे .
उन्हाळा जायला तयार नाही अन पावसाळ्याला कधी येतोय असे झालेय असे काहीतरी.आम्ही मनोमन प्रार्थना करत होतो की पाउस यावा . कात्रज घाटानंतर थोडीशी पेटपूजा केली. राजगडावर खाण्याची सोय नसल्याने एकतर जेवण सोबत घेऊन जावे किंवा खालीच भरपूर खाऊन घ्यावे. कारण चढताना देखील रस्त्यात लिंबू सरबत, ताक असे काही मिळत नाही.त्यामुळे आम्ही २-२ पोहे आणि चहा कॉफी घेतलं. ताजं तवानं होऊन मग आम्ही नसरापूर च्या दिशेने मार्गस्थ झालो. तिथे केळी, लिंबू (सरबतासाठी) आणि पाणी घेऊन पुढे निघालो.

जाताना पूर्ण रस्त्यात राजगडाच दर्शनच झालं नाही. उंच उंच जाऊन ढगांच्या कुशीत तो गाढ झोपला होता. आणि तिकडूनच आमची गम्मत पण बघत होता.पूर्ण रस्त्यात जाताना जुन्या ट्रीप आठवत होत्या. सगळ्या ट्रीप मध्ये काढलेले, ते सगळे जुने स्पॉट आठवत होते. पण या वेळेस इरादा पक्का होता. बालेकिल्ला सर करायचाच. त्यामुळे कुठेही न थांबता आम्ही सरळ राजगडाच्या पायथ्याला पोहोचलो.

उन आता हळू हळू तापायला लागल होतं. म्हणून लगेच चढायला सुरुवात केली. पण ५ मिनिटातच रस्त्यात जांभळाची झाडे दिसली. मग काय, आधी पोटोबा या नियमानुसार मनसोक्तपणे जांभूळ खायचे असा ठरलं.
पण सगळं इतका सोप्पं नसत. जीन्स च्या pant घातलेल्या असल्यामुळे कोणालाच वर चढता येईना. मी तर अभ्याच्या खांद्यावर उभा राहून जांभूळ तोडायचा प्रयत्न केला. पण अफसोस. शेवटी गपचूप खाली पडलेले जांभूळ खाल्ले आणि लगेच निघालो. (कदाचित राजगड पण आमची वाट बघत असावा म्हणूनच आम्हाला लगेच निघावं लागल.)
राजगड चा रस्ता उन्हाळ्यात फारच भकास वाटतो. कारण आजूबाजूला झाडी तशी कमी आहे. आणि शेत जास्त आहेत. त्यामुळे सगळेच ओसाड दिसते. पण पावसाळ्यात हेच दृश्य एकदम वेगळेच असते. सगळी झाडे हिरवीगार झालेली असतात. शेत हिरवे असते. डोंगर हिरवा झालेला असतो. जरी उन्हाळा असला तरी थोडा गड चढून गेल्यावर जो गार वारा येतो त्याची मजा काही वेगळीच आहे. या वेळेस ध्येय्य ठरलेला असल्यामुळे रस्त्यात थांबे पण कमी घेतले. पण एक गोष्ट मात्र बदलली नव्हती. ती म्हणजे आमचे फोटो. (अभ्या चा कॅमेरा सोम्याने पळवला होता. त्यामुळे मोबाईल च्या कॅमेऱ्याने फोटो काढत होतो.) थोडे कमी काढले पण काढले.
सगळ्यांचाच राजगड २ वेळा झाला होता त्यामुळे रस्ता लगेच लक्षात येत होता.

२ तासात आम्ही राजगडाच्या मंदिराजवळ पोहोचलो. तिथे एक पाण्याच टाकं आहे. तिथे पाणी थंड असते. पण या वेळेस आम्ही गेलो तेव्हा टाक्याची अवस्था फारच दयनीय होती. आजींना पाण्यासाठी विचारले असता, "तळ्यातालेच पाणी प्या." असे सांगितले. तळ्यापाशी गेलो तर पाण्याचा रंग पाहून सगळ्यांच्या तोंडाचा रंगच उडाला. पण ईलाज नव्हता. सोबत असलेल पाणी रस्त्यात कुठे उडून गेल कळल पण नाही. आणि रूम वरून जोशमध्ये निघताना भरून ठेवलेल्या बाटल्या आम्ही रूमवरच विसरून आलो होतो. हे पण आम्हाला गडावर गेल्यावर आठवल कि 'आपण बाटल्या भरून ठेवल्या होत्या'.
तिथे मग जेवायची order देऊन आम्ही मंदिराच्या मागच्या भिंतीवरून तोरणा बघत होतो. तोरणा काही आम्हाला नवीन नव्हता. किंवा त्याचा रस्ता पण नवीन नव्हता. पण नवीन होता ते बघण्याच साधन. या वेळेस सोबत योग्याने हरिश्चंद्र गडावर जाताना जी दुर्बीण विकत घेतली होती ती सोबत होती. सिंहगड, तोरणा, आजूबाजूचा परिसर सगळा बघण्यात १ तास निघून गेला.थोड्या वेळाने आजींनी पिठलं, भाकरी, कांदा आणि चटणी आणून दिली. सकाळचे २ प्लेट पोहे तर किती पुरणार? सगळे जन २ दिवस भुकेले असल्यासारखे त्या ८ भाकारयांवर तुटून पडले. पण खरा प्रश्न होता पाण्याचा. प्यायचं काय? पण पर्याय नव्हता. मग तेच तळ्यातल शेवाळयुक्त हिरवागार पाणी नाक आणि डोळे बंद करून पोटात टाकल.







बालेकिल्ला आणि पदामावती माची..






सगळे मावळे परत पुढे जायला तयार झाले. पण सगळे एकत्र आहेत आणि वात न चुकता जातील असा शक्य आहे का?? संजीवनी माचीच्या रस्त्यावरून जात असताना कळल कि बालेकिल्ल्याची वाट वरून जात होती.
पण माघारी जाऊन वर चढण्याचा मूड नव्हता. मग की तिथूनच वर चढायला सुरुवात केली.५०-१०० फुट वर चढलो असेल फक्त, पण आमच्या ढाण्या वाघासाहित सगळेच धापा टाकत होते. (ढेर्या वाढल्यात दुसरं काही नाही)
पण आम्ही इतका वर आलो म्हणून कि काय गड पण आमच्यावर खुश होता. तिथेच एका ठिकाणी दगडातून थेंब थेंब पाणी झिरपत होते. तिथे मनसोक्त पाणी पिऊन बाटलीत भरून घेतले. पाण्याची किंमत कळली तिथे आम्हाला.

मागे सिंहगडावर पाऊस तर जणू त्याला मोठ्या शोवर खाली आंघोळ घालत असल्यासारखा बरसत होतं. पुढच्या १० मिनिटात आम्ही बालेकिल्ल्याच्या मुख्य प्रवेश द्वारा समोर उभे होतो. शब्दात वर्णन करण्यापेक्षा तो दरवाजा तिथे जाऊनच बघावा. तिथे थोडा वेळ विश्रांती घेऊन, मंदिरात दर्शन घेऊन बालेकिल्ल्याच्या बुरुजाजवळ गेलो.तिथे वारा तर 'मी' म्हणत होतं. जणू वादळी वाराच. महाल बघून, थोडे orkut पोस फोटो काढले. तुथून 'रोहीडा' आणि 'रायरेश्वर' चे पठार दुर्बिणीतून पाहता येते.परतीच्या वाटेवर मुख्य दाराजवळ पक्ष्यांचे आवाज ऐकत बसलो. मधेच काही माकडांचे पण आवाज आले आणि आमचा १ मिनिट वाया गेला. आता थोडे ढग जमा झाले होते. आणि बारीक पाउस पण येत होतं. साधारण ५ वाजता उतरायला सुरुवात केली. रस्त्यात एका घरात चहा आणि बिस्कीट घेतले. ७ वाजता पुन्हा गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. हात पाय धुवून, स्वच्छ पाणी पिऊन आम्ही पुन्हा पुण्याच्या दिशेने निघालो.

---सुरेश