सोमवार, २१ फेब्रुवारी, २०११

शिवजयंतीला सिंहगड



शिवजयंतीला रायगडला जायचं आमचा बेत
फसला, पण चैनच पडेना म्हणून मग कमीतकमी सिंहगडावर तरी जायचेच असे ठरवून घराबाहेर
पडलो. पण आमचे बेत सगळेच फिस्कटत गेले. गडाच्या पायथ्याला पोहोचल्यावर कळाले "काम चालू रस्ता बंद". मग काय "पावले चालती पंढरीची वाट" .
चालत जावून तानाजींना मुजरा घालायचा, सूर्यास्त बघायचा आणि लगेच परत फिरायचे असे ठरले.


 आमच्या नेहमीच्या ग्रुप बरोबर आज एक नवीन मावळा आला होता , त्याच्या वजनामुळे त्याला ढकलत ढकलत गडावर न्यावा लागला. पण पोहोचलाच तो गडावर .


गडावर पोहोचेपर्यंत सूर्याने क्षितिजावरून कल्टी मारली होती. सूर्य मावळला होता पण अजून त्याच्याकडून  क्षितिजावर विस्कटलेले रंग आवरायचे राहिलेच होते. आम्ही जमेल तेवढे रंग आमच्या कॅमेऱ्यात भरून घेतले. हे रंग तुमच्यासाठी ....


गडावर येताना "जय शिवाजी -जय भवानी" च्या घोषणा , ढोल-ताशांचा आवाज येत होता. आम्ही आज उशीराच आलो लवकर यायला हवे होते . गडावरून परत जाणाऱ्याच्या प्रत्येकाच्या कपाळावर गुलाल,कुंकू छान दिसत  होते. बरेच जण कुर्ता -पायजमा, फेटे अशा पेहरावात होते. छानच वाटत होते.




नंतर तानाजींच्या पुतळ्याला कुर्निसात, त्याचबरोबर भगवा झेंडा आणि शिवाजी महारांजाच्या प्रतिमेला कुर्निसात घालून परतीची वाट धरली. 

" सिंहगडावर जावून कांदाभजी नाही खाल्ली तर पाप लागते " म्हणे, म्हणून ७-८ प्लेट भजी ५ जणांनी खाल्लीच.

एवढे सगळं करेपर्यंत भरपूर अंधार झालाच होता. गडावर शांतता - छानच . पण
उतरायला सुरुवात केली तेवढ्यातच चंद्र उगवलाच.

मित्रांमध्ये वाद चालले होते-  एक म्हणे  फक्त सूर्यच उगवतो आणि मावळतो, चंद्र उगवत-मावळत नसतो , खरे खोटे काय ते चंद्र-सूर्यालाच माहित. एवढं मात्र नक्की आम्ही कशावरही वाद घालू शकतो .


चंद्र अप्रतिमच दिसत होता . त्याचे काही फोटोग्राफ्स ..
काही ठिकाणी आमच्यातला फोटोग्राफर जागा होतो
आणि मग  मागे राहिलो की बाकीच्या लोकांच्या आम्ही
शिव्या खातो . चालायचेच.

     कोणाकडे battery नव्हतीच, नशीब पोर्णिमा नुकतीच
होऊन गेली होती, त्यामुळे चंद्र पूर्ण जोषात होता.
गडावर अगोदरच आम्ही वाद घातला होता -पोर्णिमा झाली की अमावस्या चंद्र उगवल्यामुळे ह्या वादावर पडदा (उजेड?) पडला.


चंद्राच्या कृपेमुळे अडखळत- धडपडत का होईना पण शेवटी दहा-साडेदहाला पायथ्याला पोहोचलो. मग गाड्या घेऊन डायरेक्ट पुणे ...
---BinaryBandya™

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०११

मल्हारगड

पुण्याजवळचे किल्ले म्हटले की नजरेसमोर येतात ते सिंहगड-राजगड-तोरणा, लोहगड-विसापूर, पुरंदर. पण सासवड जवळ एक सुंदर मल्हारगड नावाचा किल्ला लपलाय . हा किल्ला सोनोरीचा किल्ला म्हणून पण ओळखला जातो . बहुतेक जणांना त्याचे नाव सुद्धा माहित नाही .
पुण्यावरून फक्त ३० किलोमीटर , दिवेघाट ओलांडला की डावीकडे सोनोरी गावात वळायचे . ४-५ किलोमीटर जात नाही तोवरच उजव्या हाताला एक मोठा दरवाजा दिसतो . इथे ज्यांनी मल्हारगड बांधला त्या पानसे सरदारांच्या वाड्याचे अवशेष आहेत . गडाच्या पायथ्यापर्यंत तुमची चार-चाकी गाडीही आरामात जाऊ शकते. गडाच्या पायथ्यापासून माथ्यावर पोहोचण्यास फारतर ४५ मिनिटे लागतात . गडावर खंडोबा आणि महादेवाची प्रेक्षणीय अशी मंदिरे आहेत . गडाचा पसारा फार मोठा नाहीये, १५-२० मिनिटात सगळा गड पाहून सुद्धा होतो .

दिवेघाटावर टेहाळणी करण्यासाठी पेशव्यांच्या कारकिर्दीत हा गड बांधला गेला. गडाची तटबंदी अजूनही शाबूत आहे . आतमध्ये १-२ पडक्या अन कोरड्या विहरी आणि आतल्या लहान किल्ल्याचे काही अवशेष सोडले तर गडावर मोठे असे बांधकाम नाहीये. गडाचे बुरुज, तटबंदी पण राजगड-सिंहगड सारखे मोठ्या आकाराच्या नाहीयेत . गडावरून लोणी परिसर ,सासवड परिसर दूरवर पसरलेला दिसतो.
पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे गडावर फारसे लोक -पर्यटक येत नाहीत . खरेच मनापासू जे भटके लोक आहेत ते येतात . त्यामुळे गडाचा परिसर अगदी स्वच्छ आहे , प्लास्टिक च्या बाटल्या नाहीत , केर कचरा नाही . गडावर गेल्यावर मन अगदी प्रसन्न होते.
पाण्याची आणि जेवणाची सोय स्वतःच करावी. गडावर पाणीही नाहीये अन खायला काहीही मिळत नाही . आणि जर कोणाला गडावर राहायचे असेल तर महादेवाच्या मंदिरात ५-६ जण राहू शकतात.
तुम्हाला शांत आणि गर्दी नसलेल्या ठिकाणी जायचे आहे अन ते पण पुण्याजवळ तर मल्हारगड एक चांगला पर्याय आहे .









गडावरून सूर्योदय फार छान दिसतो . आम्ही पहाटे ५ लाच पुण्यातून निघालो होतो आणि ६.३० ला गडावर पोहोचलो देखील सूर्याच्या अगोदर . भरपूर वेळ वाट पाहायला लावली पट्ठ्याने म उगवला एकदाचा .
मस्त पोज दिली त्याने .











उपयुक्त माहिती:

रस्ते:
* पुणे-दिवेघाट-सोनोरी-मल्हारगड
* पुणे-दिवेघाट-झेंडेवाडी-मल्हारगड

आसपासचा परिसर:
* सासवड , दिवेघाट , पुरंदर-वज्रगड , नारायणपूर

-- अभिजित